शेक्सपिअर या विख्यात नाटककाराचा जन्म 23 एप्रिल 1564 रोजी झाला आणि मृत्यू 23 एप्रिल 1616 रोजी झाला. काही वर्षांपासून 23 एप्रिल हा दिवस "जागतिक पुस्तक दिवस' म्हणून अनेक देशांत साजरा केला जातो. वाचनसंस्कृतीच्या संवर्धनासाठी अनेक उपक्रम या निमित्ताने साजरे केले जातात. त्यामुळे हा दिवस "वाचक दिवस' म्हणूनही ओळखला जातो. वाचकांमुळेच ग्रंथांचे आणि लेखकांचे अस्तित्व अर्थपूर्ण होते. या पुस्तक दिवसाच्या निमित्ताने वाचकांच्या हक्कांचा पुनरुच्चार करण्याची गरज आहे.
डॅनिएल पेन्नाक (Daniel Pennac) या फ्रेंच लेखकाने "द राइट्स ऑफ द रीडर' हे पुस्तक 1992 मध्ये प्रसिद्ध केले. त्याचे इंग्लिश भाषांतर सारा ऍडॅम्स या लेखिकेने केले. डॅनिएलने तयार केलेला "वाचकांच्या हक्कांचा जाहीरनामा' आपल्या वाचनसंस्कृतीच्या संकल्पनेच्या कक्षा रुंदावणारा आहे. वाचकांच्या हक्कांच्या या जाहीरनाम्यातील दहा कलमे पहिल्यांदा वाचल्यावर प्रथम त्यातील विरोधाभास, परखडपणा, रोखठोकपणा जाणवतो आणि हा वाचनसंस्कृतीचा पुरस्कर्ता आहे की विरोधक आहे, असा प्रश्न पडतो. वाचकांचा पहिलाच हक्क म्हणून तो चक्क "पुस्तक वाचण्याचा हक्क' असे सांगतो; पण त्याचाच पर्याय म्हणून पुस्तक न वाचण्याचा किंवा उडत उडत वाचण्याचा, शेवटपर्यंत न वाचण्याचा हक्कही पुढे ठेवतो! परंतु, जसजसा या दहा हक्कांचा थोडा खोलवर जाऊन आपण विचार करू लागतो, तेव्हा डॅनिएल वाचकांच्या हक्कांचा आग्रह धरताना वाचनसंस्कृतीच्या आणि वाचनप्रक्रियेच्या प्रभावासाठीच प्रयत्नशील आहे, हे लक्षात येते. पुस्तके म्हणजे मानवी संस्कृतीच्या प्रवाही सातत्याचे, ज्ञानाचे, रंजनाचे, संवादसंपर्काचे, अनुभवांच्या संक्रमणाचे माध्यम म्हणून महत्त्वपूर्ण आहेत आणि वाचक हा या माध्यमाचा संवाहक आहे. या दृष्टिकोनातूनच डॅनिएलने या दहा हक्कांची सनद सिद्ध केली आहे.
डॅनिएलने मांडलेले वाचकांचे हक्क... वाचन हा प्रत्येकाचा हक्क आहे : प्रत्येक व्यक्तीने लेखन-वाचनाची प्रक्रिया आत्मसात करून शिक्षण घेऊन ज्ञानसंपादन करून आपल्याला अपेक्षित ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्नशील राहायला हवे. ज्ञान व कौशल्य मिळवण्यासाठी ग्रंथांचे वाचन आणि आकलन आवश्यक आहे. पुस्तके वाचण्याचा हक्क प्रत्येकाला आहे, तसेच पुस्तके व वाचण्याचा हक्कही प्रत्येकाला आहे. पण शिक्षण व वाचन यांची अपरिहार्यता गृहीत धरून ज्ञानसंपादनाचे साधन म्हणून वाचनाचा हक्क बजावला पाहिजे.
पुस्तक पूर्ण न वाचता तसेच अर्धवट सोडण्याचा हक्क : एखादे पुस्तक पूर्ण वाचता आले नाही, तर त्याबद्दल स्वतःला अपराधी मानण्याची वा न्यूनगंड बाळगण्याची गरज नाही. एखादे पुस्तक वाचायला घेतले आणि ते कंटाळवाणे वाटले तर ते वाचून संपवायलाच हवे अशी जबरदस्ती वाचकावर करता येत नाही. आज वाचावेसे न वाटलेले पुस्तक उद्या वा पुढे कधी निःसंकोचपणे वाचायला घेण्याचाही हक्क प्रत्येकाला आहे.
पुस्तक पुनःपुन्हा वाचण्याचा हक्क : एखादे पुस्तक खूप आवडले, त्याच्याशी मैत्र जडले आणि ते पुनःपुन्हा वाचावेसे वाटले तर त्याबद्दल नाव ठेवण्याचे कारण नाही. पहिल्या वाचनात आकलनात न आलेल्या बाबी दुसऱ्या, तिसऱ्या वाचनानंतर उलगडत जातात आणि त्या आपल्या मनोविश्वात स्थानापन्न होतात. एकाच वाचनात पुस्तकाचा संपूर्ण अन्वयार्थ लागतो असे नाही. मात्र, याचा अर्थ त्या पुस्तकाचीच पारायणे करीत राहावे, असाही घेऊ नये. परंतु, आपल्याला आवडलेली पुस्तके वेगवेगळ्या वयात व वातावरणात वाचताना त्यातील तपशील आणि वैविध्य जास्त जाणवत राहते. प्रत्येक नवे वाचन ही नवी अनुभूती ठरते.
काहीही वाचण्याचा हक्क : अमुकच पुस्तके वाचावी, अमुकच लेखकाची पुस्तके वाचावी, अमुकच विचार वा मते मांडणारी पुस्तके वाचावी, असा आग्रह नसावा. आपल्याला न रुचणाऱ्या पुस्तकावर काही सत्ताधीश बंदी घालतात. विरोधी वा पाखंडी मतांना दडपू पाहतात. अशा बंदीचा वा बहिष्काराचा अवलंब कोणीही करू नये. संप्रदाय, धर्म, साम्यवाद वा तत्सम राजकीय विचारसरणी यांच्या नावाने पुस्तकांवर बंदी घालणे, ती वाचण्याचा वाचकांचा हक्क हिरावून घेणे योग्य नाही.
पुस्तक म्हणजे संपूर्ण वास्तव असा समज/ गैरसमज करून घेण्याचा हक्क : कथा-कादंबऱ्यांतील अनुभव हे बहुतांशी काल्पनिक असतात. त्यातील व्यक्तिरेखांमध्ये सत्य-असत्याचे मिश्रण असते. घटना-प्रसंगात वास्तव-अवास्तवाचे मिश्रण असते. काही वेळा "या कादंबरीतील सर्व पाने आणि प्रसंग काल्पनिक आहेत, कोणाला त्यात विशिष्ट व्यक्तीचा वा घटनेचा प्रत्यय आला तर तो केवळ योगायोग समजावा,' अशी टीप अनेक पुस्तकात वाचायला मिळते. परंतु, वाचकाला कादंबरीतील कथानक, व्यक्तिरेखा आणि घटना या खऱ्या आहेत, असे वाटत असेल तर तसा ग्रह करून घेण्याचा हक्क आहे.
कोठेही वाचण्याचा हक्क :एखादे पुस्तक वाचताना ते अमुकच जागी वा ठिकाणी बसून वाचावे असे बंधन असता कामा नये. ते कुठेही बसून वाचता यावे. कोणी बेडरूममध्ये गादीवर ऐसपैस लोळत वाचेल, कोणी आरामखुर्चीवर बसून, कोणी टेबलावर ठेवून, कोणी लोकल वा बसमध्ये प्रवास करताना, कोणी उभे राहून वाचत असेल, तर त्याला मज्जाव करता येणार नाही. कोणी टीव्ही बघताना, क्रीडांगणावर सामना चालू असताना, वर्गात शिक्षक शिकवत असताना, व्याख्यान ऐकताना वाचत असेल तर त्याला आडकाठी करण्याचे कारण नाही. वाचन हे कुठेही करावे, कसेही करावे.
पुस्तकात गढून जाण्याचा हक्क : एखादी कादंबरी, कथा, वैचारिक वा तात्त्विक भूमिका मांडणारी पुस्तिका वाचताना तिच्यात पूर्ण गढून जाण्याचा, त्या वातावरणाशी समरस होण्याचा हक्क वाचकाला आहे. जादूची, काल्पनिक कथावस्तू आहे, हे ठाऊक असूनही हॅरी पॉटर वाचताना मी त्याच्या त्या शाळेतल्या वातावरणाशी, जादूच्या करामतींशी समरस झालो तर तो वाचक म्हणून माझा स्वाभाविक अधिकार आहे. एखाद्या व्यक्तीशी वा नायक-नायिकेशी वाचकाने एकरूप होणे हे त्या कलाकृतीच्या आवाहकतेचे एक लक्षण आहे.
मोठ्याने वाचण्याचा हक्क :पुस्तक वाचताना ते एकट्याने आपल्या मनोमनच वाचायला हवे, असा आग्रह नसावा. ते मोठ्याने वाचण्याची, त्यातील प्रत्येक शब्द इतरांना ऐकू जाईल इतक्या मोठ्याने वाचण्याची वा पुटपुटण्याची मोकळीक वाचकाला आहे. लहान मुलांना लिहिता-वाचता येत नाही. त्यांना त्यांच्या पालकांनी गोष्टींची वा माहितीची पुस्तके मोठ्याने वाचून दाखवण्याची गरज असते. मूल पोटात असल्यापासून त्याला सर्व समजते, वाचलेले कळते, मूल बोलायला लागल्यावर आरंभीचा बोबडे बोल बोलण्याचा काळ संपला, की व्याकरणशुद्ध वाक्ये बोलू लागते, असे अनेक सर्वेक्षणानंतर सिद्ध झालेले आहे. इंग्लिशमध्ये पिक्चर बुक्स विपुल आहेत. तेथील पालक मूल दोन-तीन महिन्यांचे झाल्यापासून ही पुस्तके त्याला मोठ्याने वाचून दाखवतात. त्यातील व्यक्ती, प्राणी, निसर्ग, रंग, आकार याकडे लक्ष वेधतात. त्यामुळे पुढे मुले लवकर वाचायला सरावतात, असा अनुभव आहे.
पुस्तक वाचल्यावर त्याबद्दल कोणाशीही चर्चा न करता शांत राहण्याचा हक्क : एखादे पुस्तक वाचल्यावर त्याबद्दलची आपली प्रतिक्रिया आपण आपल्या मित्रांजवळ वा आप्तांजवळ व्यक्त करतो. परंतु, दरवेळी अशी प्रतिक्रिया व्यक्त करायलाच हवी असे नाही. एखादे पुस्तक वाचून आपण अंतर्मुख होतो, अस्वस्थ होतो, निःशब्द होतो. अशा वेळी त्या पुस्तकाबद्दल चर्चा करण्याची इच्छा नसेल, तर आपण स्तब्ध राहू शकतो, शांत राहू शकतो.